पुण्यातून रेल्वेने परराज्यात जाणाऱ्या मजुरांचा खर्च काँग्रेस करणार – मोहन जोशी

14

पुणे – परराज्यातील आपापल्या गांवी रेल्वेने जाऊ इच्छिणाऱ्या पुणे आणि परिसरातील मजुरांचा खर्च काँग्रेस पक्ष करणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली. याबाबतचे निवेदनही त्यांनी पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांना दिले आहे.

केंद्र सरकारने केवळ चार तासांची मुदत देऊन लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे लाखो मजूर आपापल्या गांवी जावू शकले नाहीत. त्यातील काहीजणं पायपीट करत गेले. १९४७ च्या फाळणीनंतर प्रथमच असे विदारक चित्र देशात पाहायला मिळाले. आजही लाखो मजूर देशाच्या अनेक भागांमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना आपापल्या गांवी जायचे आहे. पण, जाण्यासाठी काही व्यवस्था नाही. त्यांच्याजवळ पैसेही नाहीत. हे मजूर संकटात असताना भारत सरकार व रेल्वे मंत्रालय या मजुरांकडून गाडी भाड्यासाठी पैसे घेत आहे हे दुर्देव आहे. परदेशात अडकलेल्यांना आपण आपले कर्तव्य म्हणून विशेष विमान पाठवून त्यांना मायदेशी आणण्याची मोफत सोय केली. गुजरातमधील एका कार्यक्रमाच्या भोजन आणि प्रवासासाठी शंभर कोटी रुपये खर्च केले. रेल्वे मंत्रालयाने प्रधान मंत्री कोरोना फंडात एकशे एक्कावन्न कोटी देणगी देऊ शकते तर देशाच्या विकासात ज्यांचे योगदान आहे त्या गरीब मजुरांना मोफत रेल्वेची सुविधा का देऊ शकत नाही? या मजुरांच्या मोफत रेल्वे प्रवासासाठी काँग्रेस पक्षाने वारंवार मागणी केली. परंतु, ना सरकारने, ना रेल्वे मंत्रालयाने त्याकडे लक्ष दिले. म्हणून काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनिया गांधी यांनी ठाम भूमिका घेऊन निर्णय घेतला की, या मजुरांना त्यांच्या गांवी मोफत पाठविण्यासाठी त्या-त्या राज्यांमधील प्रदेश काँग्रेस त्या मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च करेल. त्यांच्या या भूमिकेला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. मा.बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाप्रमाणे पुणे आणि परिसरातून रेल्वेने गांवी जावू इच्छिणाऱ्या मजुरांचा खर्च काँग्रेस पक्ष करणार आहे.

याकरिता पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे रेल्वे विभागाचे व्यवस्थापक यांना निवेदने दिली. पुणे आणि परीसरातून जावू इच्छिणारे मजूर, रेल्वे प्रशासनाचा त्यांच्यासाठी होणारा खर्च याचा तपशील मागवला आहे. तो तत्काळ मिळावा असे निवेदनात म्हटले आहे.

रेल्वेने जावू इच्छिणाऱ्या मजुरांची तपासणी बी.जे मेडिकल ग्राऊंड अथवा तत्सम ग्राऊंडवर करण्यात यावी असे जिल्हाधिकाऱ्यांना सुचविण्यात आले आहे. तसेच वैद्यकीय स्वरुपाचे सहकार्य करण्याची तयारी काँग्रेस पक्षाने दाखवली आहे असे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!